

लेण्याद्री : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ला येथे मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली असताना अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत चार शिवभक्त जखमी झाले असून त्यापैकी दोघांना उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंती निमित्त हजारो शिवभक्त शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आले होते. याचदरम्यान शिवजन्मस्थळाच्या परिसरात असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांमधून अचानक थवा बाहेर पडला आणि काही भाविकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली. अनेक भाविकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत जखमी भाविकांना गडावरून खाली आणले आणि त्यांना तातडीने उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मधमाशांच्या हल्ल्यात विकास मोहन जमादार (रा. चिखली) आणि धनंजय विजय दाभाडे (रा. चिखली) हे शिवभक्त जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उन्हाचा वाढलेला तडाखा, भाविकांकडून वापरले जाणारे सुगंधी स्प्रे तसेच मोठ्या प्रमाणावर होणारा गोंगाट यामुळे मधमाशा अस्वस्थ होऊन हल्ला करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांनी आणि भाविकांनी अशा ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाकडून परिसराची पाहणी करण्यात येत असल्याची माहितीही मिळाली आहे.