

निमोणे: शिरूर तालुक्यातील चासकमानच्या लाभक्षेत्रातील टेल भागामध्ये पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे, बहुतांश पाझर तलाव कोरडे पडले असून, या परिसरातील सर्वांत मोठा मोटेवाडी पाझर तलावात फक्त आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तातडीने चासकमानचे आवर्तन सोडा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या वृषाली वाळके यांनी केली आहे.
सध्या उन्हाची तीवता वाढत चालली असून, विहिरी, कूपनलिका, ओढे-नाले कोरडे पडले आहेत. चासकमानच्या टेल भागाला टंचाईच्या काळात प्रकल्पाचे पाणी हाच एकमेव आशेचा किरण आहे. बहुतांश पाझर तलाव आटल्यामुळे शेतातील पिके कोमेजून चालली आहेत. मोटेवाडी पाझर तलावामुळे लंघेवाडी, चव्हाणवाडी, दुर्गेवस्ती आदी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. वेळीच आवर्तन सुटले नाही तर या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या जटिल होऊ शकते.
निमोणे, गुणाट, न्हावरे, निर्वी, आंधळगाव आदी परिसरात देखील पाण्यासाठी शेतकरी आग््राही असून, लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन तातडीने टेल टू हेड या स्वरूपात आवर्तन सोडण्यात यावे. आवर्तनाला उशीर झाला तर पाण्यासाठी अनेक ठिकाणी कालवा फोडाफोडीचा प्रकार यापूर्वी घडला आहे. त्यामुळे विलंब न करता प्रशासनाने तातडीने आवर्तनाचे नियोजन करावे, अशी मागणी वृषाली वाळके यांनी केली आहे.