पुणे : पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते आमदार, खासदारकीपर्यंतच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलो आहे. त्यामुळे मनात कोणतीही कटुता न ठेवता उमेदवार कोणीही असो त्याला निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन साधण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खा. श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यासह तिन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.
मोदीच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 1972 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे, हे दुसर्या पक्षातून आलेल्यांना हे आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे. मोदी यांच्या विजयाच्या हॅटट्रिकमध्ये येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याचे संधी या मेळाव्यात आली आहे, असे निंबाळकर म्हणाले.
खासदार जावडेकर म्हणाले, राज्यातील सर्व 48 जागा निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. बारामती लोकसभा मतदारसंघ 2014 मध्येच जिंकणार होतो. थोडक्यात घोटाळा झाला. आयोद्धेतील श्रीराम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर काँग्रेस पक्ष बहिष्कार टाकत आहे. देशातील जनता तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस राहिले असून, सर्व पक्षांनी एकजीवाने काम केले पाहिजे. प्रत्येक घरी जाऊन आपले मत पोहोचवा. कामाचे वाटप नीट करून वेळापत्रक तयार करा, असे जावडेकर म्हणाले.
हेही वाचा