

पुणे: सध्या दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले असून, पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आणि संबंधित इयत्तांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु ते देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांकडून ठराविक शुल्क घेण्यात येत आहे. हे शुल्क घेतल्यास शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
डॉ. वाहूळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सद्यःस्थितीत दहावी, अकरावी, बारावीचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून, विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी संबंधित शाळा, महाविद्यालयाकडे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करीत आहे.
विशेषतः इंदापूर तालुक्यामधील सर्वच शाळा, महाविद्यालये संबंधित कागदपत्रे विद्यार्थ्यांना देताना प्रति विद्यार्थी २०० रुपये बेकायदा गोळा करत आहेत. त्यानुसार आपले अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून कोणतीही वसुली विद्यार्थ्यांकडून करण्यात येऊ नये, याबाबत आदेश देण्यात यावेत.
इंदापूर तालुक्यातील ज्या शाळांनी अशा पद्धतीने रक्कम घेतलेली आहे, अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे त्यांना परत करण्यात यावेत, अशी मागणी तक्रारदाराने संबंधितांना केलेली आहे.
त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास व अर्जदारास ई-मेलद्वारे सादर करण्यात यावा, असे देखील डॉ. वाहूळ यांनी स्पष्ट केले आहे.