

अमृत भांडवलकर
सासवड : पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड शहराची लोकसंख्या, व्यापारी उलाढाल आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर ताणही वाढला आहे. त्यातच शहरात पार्किंगची पुरेसी सोय नसल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.
सासवड हे तालुक्याचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र असल्याने दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येत असतात. याशिवाय जेजुरी, पुणे, भोर, बारामती आणि इतर भागांकडे जाणारी वाहतूकही सासवडमधूनच होत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर सतत वाहनांची वर्दळ असते. शहरातील मुख्य बाजारपेठ, शिवतीर्थ चौक, जयप्रकाश चौक, सरदार गोदाजीराजे चौक, श्रीनाथ चौक, जेजुरी नाका, पालखीमार्ग तसेच बसस्थानक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सासवडच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते तुलनेने अरुंद असून, दोन्ही बाजूंना दुकाने आहेत. खरेदीसाठी येणारे नागरिक अनेकदा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक संथगतीने सुरू राहते. विशेषतः सकाळी व सायंकाळी बाजाराच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनते. शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असलेल्या शिवतीर्थ चौक आणि जयप्रकाश चौकात अनेक रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी सिग्नल व्यवस्था नसणे, वाहनचालकांकडून नियमांचे पालन न होणे आणि रस्त्यावर होणारे अनधिकृत थांबे यामुळे वारंवार कोंडी होते. शाळा आणि कार्यालयांच्या वेळेत येथे वाहनांच्या लांब रांगा लागतात.
जेजुरीकडे जाणाऱ्या मार्गावरील जेजुरी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते. याशिवाय आषाढी वारी, धार्मिक उत्सव आणि यात्रांच्या काळात पालखी मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढते. परिणामी वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊन कोंडीची समस्या अधिक तीव्र होते. शहरातील अनेक भागांत वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात.
काही ठिकाणी दुकानदार, ग्राहक आणि व्यावसायिकांकडून रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ वाहने उभी ठेवली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळे निर्माण होतात. गेल्या काही वर्षांत सासवडमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यानुसार सार्वजनिक पार्किंगची सुविधा विकसित झालेली नाही. शहरात नियोजित बहुमजली पार्किंग, स्वतंत्र वाहनतळ किंवा मोठ्या क्षमतेच्या पार्किंग झोनची कमतरता असल्याने नागरिकांना वाहन उभी करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही.
व्यापाऱ्यांना फटका
वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येचा परिणाम स्थानिक व्यापारावर होत आहे. ग्राहकांना वाहन पार्क करण्यासाठी जागा न मिळाल्याने अनेकदा ते बाजारपेठेत येणे टाळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
उपाययोजनांची गरज
वाहतूकतज्ज्ञ आणि नागरिकांच्या मते वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शहरात नियोजित सार्वजनिक पार्किंगची उभारणी करणे गरजेचे आहे. मुख्य चौकांमध्ये आधुनिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि सिग्नल बसवावेत. बेशिस्त पार्किंगविरोधात नियमित कारवाई करावी. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी. मुख्य बाजारपेठेत नो-पार्किंग क्षेत्रांचे काटेकोर पालन करावे. भविष्यातील वाहनवाढ लक्षात घेऊन सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे.