

आळंदी: आळंदीकरांचा निरोप घेत माउलींची पालखी गुरुवारी (दि.९) सकाळी सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी सर्व आळंदीकर आपल्या माऊलींना निरोप देताना भारावले होते.महिनाभराचा दुरावा ठेवत माऊली पुण्याकडे मार्गस्थ झाली.इंद्रायणी माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदार पणे वाहत असल्याचे आज काहीसे चित्र होते.हरिनामाच्या गजरात काल बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते.
तद्नंतर ती पहिल्या मुक्कामासाठी आजोळ घरी नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती.सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवद्य दाखविल्या नंतर पालखी सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली.यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी वारकऱ्यांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी चहा,नाष्टा व फळे मोफत उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदवला.सकाळी नऊच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर,भोसरी फाटा,साईमंदिर येथे विसावली येथे समाज आरती घेण्यात आली.तदनंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली.
चऱ्होली,वडमुख वाडी,चोवीसावाडी,दिघी मँगझिन,साई मंदिर आदी भागातील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी,डुडुळगाव,चिंबळी,कुरुळी,मोई,केळगाव,मरकळ,सोळु, धानोरे,गोलेगाव आदी गावांतून नागरिक माऊलीना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
मार्गाचा प्रश्न सुटला नित्याच्या मार्गानेच पालखी मार्गस्थ
इंद्रायणी नदीवरील पूल महापुरात पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते.शिवाय पूल देखील धोकादायक बनला होता.यामुळे पालखी नेहमीच्या पुलावरून नदी पार करणार की मार्ग बदलणार अशी चर्चा होती.मात्र पुलावरील पाणी ओसरल्याने व सुरक्षेचा आढावा योग्य आल्याने.पालखी नेहमीच्याच पुलावरून नगरपालिका चौकातून मार्गस्थ झाली.दिंड्यांची वाहने मात्र चऱ्होली बायपास मार्गे पाठविण्यात आली.