

सांगवी: बारामती तालुक्यातील सांगवी ते वाघवस्ती रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना पुलाची उंची वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सांगवी परिसरातील वाघवस्ती, तावरेवस्ती, शिंदे-भापकरवस्ती, ननवरेवस्ती, कदमवस्ती, एजगरवस्ती आणि अहिल्यानगर येथील नागरिकांसाठी सांगवी-वाघवस्ती हा एकमेव प्रमुख संपर्क रस्ता आहे. या मार्गावरील मांदानी चारीवरील पुलाची उंची कमी असल्याने अवघा 40 मिलिमीटर पाऊस झाला, तरी पुलावरून पाणी वाहू लागते.
त्यामुळे नागरिकांना चार किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. पुलावर पाणी आल्याने शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय, दूध वाहतुकीचा खोळंबा, तसेच रुग्णांना रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होतात.
मागील वर्षी 25 मे 2025 रोजी झालेल्या 85 मिलिमीटर मान्सूनपूर्व पावसात मांदानी चारीला पूर येऊन संपूर्ण पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दर वर्षी उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या मते, दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करतानाच पुलाची उंची वाढविण्याची तरतूद होणे आवश्यक होते. गावातील इतर रस्त्यांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, मात्र या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.