

राजगुरुनगर: "नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचं दान रे... फक्त भिजव देवा ने तहानलेलं रान रे..." शेतकऱ्यांच्या कणखर हृदयातून उमटणारी ही व्यथा आता वास्तवात उतरू लागली आहे. खेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सर्व पाणीस्रोतानी तळ गाठले आहेत आणि शेतीसाठी महत्त्वाच्या चासकमान धरणात केवळ ५.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ही गेल्या अनेक वर्षांतील सर्वात नीचांकी स्थिती आहे. गतवर्षी ही टक्केवारी १३.१८ टक्के होती आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडायला सुरुवात झाली होती.
कळमोडी धरणात सध्या १६.३७ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी ३१.५२ साठा होता. चासकमान धरणातील पाणी कमी झाले तर कळमोडीचे पाणी सोडण्यात येईल. असे असले तरी मुळात कळमोडी धरण लहान असून त्यातील साठाही कमी आहे. चासकमान धरणाची पाणी साठवण क्षमता ८.५० टीएमसी (अब्ज घनफूट) असून, कळमोडी धरणाची क्षमता १.५ टीएमसी आहे. तुलनेने भामा आसखेड धरणात २९.९४ टक्के पाणी उपलब्ध आहे. चाकण, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड शहराला या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.
खेड तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या चासकमान धरणाची स्थिती चिंताजनक आहे. सामान्यतः या काळात धरणात चांगला साठा असतो, परंतु यंदा पहिल्यांदाच ६ टक्क्यांवर पोहोचले आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पाऊस पाण्याअभावी शेतीसोबतच शेतीपुरक दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, अन्न-धान्य खरेदी-विक्री, भाजीपाला व्यवसाय अडचणीत येणार आहे. दुभत्या जनावरांना सांभाळणे कठीण होणार आहे. शेतकरी आधीच कर्जबाजारी आणि खर्चाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, त्यात पाऊस न पडल्यास यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे.
शेतात मोलमजुरी करणारे हजारो मजूर यंदा रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस पडला नाही तर शेतकरी अडचणीत येणार आणि मजूर रस्त्यावर, अशी चिंता स्थानिक शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. उजाड रानांना हिरवाई फुलवण्यासाठी शेतकरी देवाकडे हात जोडून बसले आहेत. यावर्षी भरपूर पिकू दे माझं उजाड रान अशी प्रार्थना प्रत्येकाच्या ओठावर आहे.
जिल्हा प्रशासनाने अद्याप पुरेसा उपाययोजना केल्याचे चित्र नाही. पाणी टँकरची मागणी वाढत असून, पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता कमी दर्शवली आहे, त्यामुळे दुष्काळाची झळ आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या संघटनांनी सरकारला तातडीने पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. धरणातील उर्वरित पाणी शेतीसाठी राखून ठेवणे, टँकरने पाणी पुरवठा वाढवणे आणि दुष्काळ निवारण निधी तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा यंदा खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाची शक्यता वर्तवली जात आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
खेड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार खेडसह जिल्ह्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त (आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर) तालुक्यांत मिळून एकूण १०४ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी हे टँकर सुरू आहेत. यात आदिवासी वाड्या,वस्त्यांबरोबरच काही गावठाणांचा देखील समावेश आहे.