

राहू: एप्रिल महिनाअखेरीस निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. एकीकडे ढगाळ हवामान, तर दुसरीकडे वातावरणातील प्रचंड उष्णता, यामुळे ग््राामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका कांदा काढणीला बसला आहे. दुपारच्या वेळी गावांमधील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
सध्या अनेक भागांत कांदा काढणी सुरू आहे. मात्र, उन्हाच्या तीवतेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. कडक उन्हात शेतात राबण्यास मजूर तयार नसल्याने इतरही कामे रखडली आहेत. शेतात काढून ठेवलेला कांदा उन्हामुळे होरपळून निघत आहे.
त्याचा परिणाम त्याच्या टिकवणक्षमतेवर होणार आहे. उष्णतेमुळे मजूर दुपारी लवकर काम थांबवत असल्याने काढणीचा वेग मंदावला आहे, परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे दुपारी शेतात काम करणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतकरी आता पहाटे शेतात जाऊन कामाला सुरुवात करीत आहेत.
सकाळी 10 वाजेपर्यंत काम आटोपून घराकडे परतत आहेत. सकाळी 11 नंतर उन्हाची तीवता वाढत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. एरवी गजबजलेले गावातील पारावरचे कट्टे आणि मुख्य रस्ते दुपारी अगदी निर्मनुष्य होत आहेत. बाजारपेठांमधील व्यवहारही मंदावले आहेत.
आरोग्य विभागाचे आवाहन
वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी ?जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि उन्हात काम करताना विश्रांती घ्यावी. दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. ?बाहेर पडताना डोक्याला पांढरा रुमाल किंवा टोपीचा वापर करावा. ?थकवा जाणवल्यास त्वरित ओआरएस किंवा लिंबू पाण्याचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.