Pune Traffic Congestion: पुण्यात वाहतूक कोंडीला हॉटेल्स जबाबदार? बेकायदा पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
निनाद देशमुख
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा प्रवास दिवसें दिवस अधिकच त्रासदायक बनत असताना, अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स समोरील बेकायदा पार्किंगकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसतानाही सुरू असलेल्या अनेक हॉटेल्समुळे ग््रााहकांची वाहने थेट रस्त्यावर उभी राहत असून, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, खाद्यगृह आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही हॉटेल्स आहेत. येथे संध्याकाळच्या वेळेत येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हॉटेल्ससमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र असते. काही ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग वाहनांनी व्यापलेला असतो. परिणामी बस, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच इतर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पार्किंग नसलेल्या अशा हॉटेल्सवर कारवाई होणे अपेक्षित असतानाही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, मोठ्या हॉटेल्ससमोरील वाहनांवर क्वचितच कारवाई होत
असल्याने व्यावसायिकांना अप्रत्यक्ष अभय दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळेच कारवाई टाळली जाते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई न करता ठोस धोरण आखण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पार्किंग व्यवस्था नसलेल्या हॉटेल्सना परवाने देणे थांबविणे, विद्यमान आस्थापनांना ठराविक कालावधीत पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
हॉटेल्सना परवाना देताना पार्किंगची सुविधा आवश्यक
नियमांनुसार हॉटेल्सना परवाना देताना पार्किंगची सुविधा आहे का, याची खात्री करणे आवश्यक असते. तरीही अनेक रेस्टॉरंट्स, बार आणि खानावळींकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसतानाही त्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परवाना देण्याची जबाबदारी महापालिकेवर असताना, प्रत्यक्षात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर येते. या दोन्ही विभागांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका नागरिकांना बसत आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी, महापालिकेचा व्यापार परवाना, अन्न सुरक्षा परवाना (एफएसएसएआय), आरोग्य तपासणी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र अशा विविध परवान्यांची अट असली तरी प्रत्यक्षात या नियमांचे पालन होते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या मार्गावर प्रामुख्याने हॉटेल्स कर्वे रोड, एफ.सी. रोड, बाणेर, कोथरूड, औंध, विमाननगर आणि कॅम्प परिसरात ही समस्या अधिक तीव असल्याचे दिसून येते.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंट्स आणि कॅफेमुळे या भागांत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, पार्किंगची सुविधा नसल्याने ग््रााहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. परिणामी वाहन कोंडी वाढते.
पार्किंग सुविधा नसतांना हॉटेल्सच्या संख्येत वाढ
शहरात खाद्य व्यवसायांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यानुसार पार्किंग सुविधा निर्माण झालेली दिसत नाही. उद्योग संघटनांच्या अंदाजानुसार शहरात सुमारे 6 हजारांहून अधिक नोंदणीकृत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. महापालिकेच्या पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार 15,842 खाद्य व्यवसायांपैकी तब्बल 7,185 व्यवसाय परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळले होते. सध्या ही संख्या आणखी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

