

पुणे: शहरात डेंग्यू, चिकनगुनियाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आता स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सुमारे ११ पटीने रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी रुग्णालयातील खाटांचे (बेड) नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, गणेशोत्सव, नवरात्र आणि इतर सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी गर्दीमध्ये काळजी घेण्याची आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे १३ रुग्ण होते. जुलैमध्ये ही रुग्णसंख्या वाढून ३५ झाली. ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत थेट ११ पटीने वाढ होऊन ४०७ वर गेली तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही रुग्णसंख्या ५४६ पर्यंत वाढली आहे. रुग्णसंख्येत अचानक होणारी वाढ ही चिंताजनक असून, याचा परिणाम रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर झाला आहे.
विशेषतः खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) खाट न मिळाल्याने उदगीर आणि बीड येथील गंभीर महिला रुग्णांना ससून रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दुसरीकडे ससूनमध्ये आयसीयू खाट उपलब्ध न झाल्याने काही दिवसांपूर्वी एका महिलेचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता स्वाईन फ्लूच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याचे रुग्णालय व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी थकवा किंवा श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रमुख कारणे
हवामानातील बदल, ऊन-पावसाचा लपंडाव यामुळे दमट वातावरण आणि सण, उत्सवांचा काळ यामुळे संसर्गजन्य प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.