

पुणे: "महिला आरक्षणावरून गळे काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्वतःचा 'स्तर' तपासावा. त्यांच्यात चांगदेवाचा अहंकार भरला असून, त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांचा अपमान करून महिलांना तुच्छ लेखले आहे," अशा घणाघाती शब्दांत उबाठा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान मोदींच्या जुन्या ट्विट्सचा पाढा वाचत भाजपच्या 'दुटप्पी' भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला.
अंधारे म्हणाल्या, जर २०२३ मध्येच महिला आरक्षण बिल मंजूर झाल्याचा दावा तुम्ही केला होता, तर आता विधेयक पडण्यामागे विरोधक जबाबदार कसे? "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५१ मध्ये महिलांच्या हक्कांसाठी मंत्रीपदाचा त्याग केला होता. महिलांसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तुमची तयारी आहे का?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आरएसएसच्या वार्षिक कार्यक्रमात महात्मा फुले यांची 'गुलामगिरी' आणि 'शेतकऱ्याचा आसूड' ही पुस्तके वाचून दाखवावीत आणि त्यावर मोहन भागवतांची प्रतिक्रिया घ्यावी, असे आव्हान त्यांनी दिले. त्याचबरोबर २०२९ मध्ये केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून भाजप एखाद्या महिलेचा चेहरा समोर करणार का, असा पेच त्यांनी सत्ताधाऱ्यांसमोर टाकला.
विधेयकाची हत्या झाली म्हणणाऱ्या फडणवीसांना प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, "तुम्हाला 'भ्रूणहत्या' या शब्दाचे गांभीर्य नाही. खऱ्या अर्थाने महिला आरक्षणाची भ्रूणहत्या १९५१ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली होती, ज्यांनी बाबासाहेबांच्या बिलाला कडाडून विरोध केला होता."
चर्चेला येण्याचे खुले आव्हान
सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. "वेळ आणि दिवस तुम्ही ठरवा, मी एकटी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला तयार आहे. जर तुम्ही चर्चेला आला नाहीत, तर तुम्ही सत्याला घाबरता असे सिद्ध होईल," असे त्या म्हणाल्या. तसेच, चित्रा वाघ यांचा उल्लेख 'चित्र-विचित्र' असा करत, "तुमच्या सांगण्यावरून अंगावर येणाऱ्या एखाद्या महिलेला मुख्यमंत्री करून दाखवा," असे चॅलेंजही त्यांनी दिले.