

पुणे: सध्या अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सटीिचे एकूण 84 विद्यार्थी सध्या दुबईमध्ये आहेत. हे सर्व विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांसोबत 4 प्राध्यापक देखील आहेत. त्यांच्यासोबत आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांशीही आमचा नियमित संवाद सुरू असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी 42 मुले आणि 42 मुली असे एकूण 84 विद्यार्थी गेले आहेत. सर्व विद्यार्थी आमच्या संपर्कात असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. आमच्या युनिव्हर्सटीिकडून परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. आमचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे, अशी माहिती युनिव्हर्सटीि प्रशासनाने माध्यमांना दिली आहे. तसेच दुबईमधील भारतीय दूतावास कार्यालयाशीही आमचा संपर्क झाला असून, आवश्यक ती समन्वय प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन इंदिरा युनिव्हर्सटीि प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व 84 विद्यार्थी भारतात कधी पोहोचणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. इराण, इस्राईल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ जगातील अन्य देशांनादेखील बसली आहे. दरम्यान, इजिप्तमध्ये पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील 17 नागरिक अडकले असून, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील एक 17 नागरिकांचा समूह एका खासगी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून 20 फेबुवारीपासून इजिप्तच्या दौऱ्यावर होता. यासंदर्भात प्रा. उज्ज्वला शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आम्ही 17 जण इजिप्त देशात पर्यटनासाठी आलो होतो आणि 1 मार्चला रात्री भारतात जाण्यासाठी कुवैतवरून आमची फ्लाईट होती.
परंतु फ्लाईट रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे कुठे राहायचे, पुढील तिकीट कसे मिळणार, भारतात परत कधी जाणार, असे विविध प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व प्रश्नांचा विचार करून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आम्हाला विमानाची तिकिटे उपलब्ध करण्यात आली आणि अखेर भारतात येण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे.