

पुणे: शहरातील रस्त्यांची तातडीने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून १५ क्षेत्रीय कार्यालयांना रोड मेंटेनन्स व्हेईकल (आरएमव्ही) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक आरएमव्हीसाठी वर्षाला सुमारे एक कोटी दहा लाख रुपये खर्च होत असून, १५ वाहनांवर दरवर्षी १६ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला जातो. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने आरएमव्ही नेमकी कुठे काम करतात? असा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्त्यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करणे, नागरिकांच्या तक्रारीनुसार खड्डे बुजविणे, पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांच्या चेंबरची दुरुस्ती तसेच पदपथांची किरकोळ कामे करणे, हा आरएमव्हीचा प्रमुख उद्देश आहे. या वाहनांमध्ये थंड व गरम डांबर मिश्रण, डांबराच्या पिशव्या आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, सध्या शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी असलेल्या आरएमव्हीची कामे मात्र नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिसून येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध करून दिलेली ही यंत्रणा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे काम करते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा प्रत्यक्ष परिणाम रस्त्यांवर का दिसत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी करण्यात येणारा खर्च प्रत्यक्ष रस्त्यांवरील कामांवर होतो की केवळ कागदोपत्री दाखविला जातो, अशी शंकाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आरएमव्हीच्या माध्यमातून केलेल्या कामांची संख्या, कामांची ठिकाणे, वापरलेले साहित्य, त्यासाठी झालेला खर्च तसेच प्राप्त झालेल्या आणि निकाली काढलेल्या तक्रारींची माहिती नियमितपणे सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरएमव्हीचा नेमका उद्देश काय?
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्त्यांची पाहणी करणे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार खड्डे तातडीने बुजविणे.
रस्त्यांची किरकोळ देखभाल दुरुस्ती करणे.
पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची दुरुस्ती करणे.
मलनिस्सारण वाहिन्यांच्या चेंबरची दुरुस्ती करणे.
पदपथांची किरकोळ कामे करणे.
वाहनामध्ये आवश्यक डांबर मिश्रण व अन्य साहित्य उपलब्ध ठेवणे.
आरएमव्हीच्या कामांचा लेखाजोखा जाहीर करा
महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आरएमव्हीच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या कामांचा तपशील सार्वजनिक करावा. कोणत्या भागात किती कामे करण्यात आली, त्यासाठी किती साहित्य वापरण्यात आले, किती खर्च झाला तसेच नागरिकां कडून किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी किती तक्रारी निकाली काढण्यात आल्या, याची माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. यामुळे आरएमव्ही वर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा प्रत्यक्ष उपयोग स्पष्ट होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
महापालिकेकडून दरवर्षी १५ आरएमव्ही गाड्यांसाठी प्रत्येकी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला जातो. या गाड्यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करून घेण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या विविध भागांत नागरिकांच्या तक्रारींनुसार कामे केली जातात.
राजेश बनकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका