

पुणे: शहरातील वाढत्या प्रदूषणाला रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेने या प्लांटवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आरएमसी प्लांट संघटनेने नियमावली (एसओपी) तयार करण्याची मागणी केली असून, प्रशासन त्यावर काम करीत आहे. मात्र, ही नियमावली मान्य असेल त्यांनीच शहरात व्यवसाय करावा; अन्यथा शहराबाहेर जावे, असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन अनेक आरएमसी प्रकल्पांकडून होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 13 प्रकल्पांवर कारवाई केली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनीही शहराच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. एका सत्ताधारी नगरसेविकेच्या पतीच्या प्लांटवरही कारवाई झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आरएमसी प्रकल्प शहराच्या विकासासाठी आवश्यक असले तरी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरएमसी प्लांटसाठी आयुक्तांनी एसओपी तयार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. आरएमसी प्लांटमुळे शहराचा विकास होतो, हे मान्य आहे. परंतु, या प्लांटमुळे जर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असेल तर हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
गणेश बिडकर, सभागृहनेते, महापालिका