

पुणे: दिवाळी आणि छठ पूजा सणाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या पुणे विभागाने एकूण 1,052 विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यापैकी 442 फेऱ्या भाऊबीजेच्या दिवसापर्यंत पार पडल्या. उर्वरित फेऱ्या डिसेंबरअखेरपर्यंत होतील. 442 फेऱ्यांद्वारे सहा लाख 69 हजार प्रवाशांनी प्रवास केला. (Latest Pune News)
दरवर्षी दिवाळी छठ पूजेच्या निमित्ताने रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष नियोजन केले जाते. त्यासंदर्भातील ही माहिती पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेशकुमार वर्मा यांनी गुरुवारी (दि.23) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा उपस्थित होते.
राजेश कुमार वर्मा म्हणाले, पुणे विभागातून दिवाळी आणि छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर 1052 अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे नियोजन आम्ही केले आहे. त्याद्वारे सुमारे 15 लाख 23 हजारांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानी सुरक्षितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. यापैकी 442 फेऱ्या आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि त्याद्वारे सहा लाख 69 हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. पुढील तीन दिवसांत प्रवाशांची सर्वाधिक सोय सुनिश्चित करण्यासाठी दररोज 10 गाड्या चालवल्या जातील आणि एकूण 34 गाड्यांची वाहतूक होईल. यामध्ये पुणे ते दानापूर, पुणे ते हरंगुळ आणि दौंड ते अजमेर यासारख्या टीओडी विशेष गाड्यांचा समावेश आहे.