

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागात मागील नऊ महिन्यांत तब्बल 301 रेल्वे प्रवाशांचा, नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चालत्या ट्रेनमधून पडल्यामुळे, फलाट आणि ट्रेनमधील अंतरामुळे पडल्याने, आत्महत्या, विजेच्या धक्क्याने, प्रवासात हृदयविकाराचा झटका, आजारपण आणि रेल्वेरूळ ओलांडताना अशा अनेक कारणांमुळे हे मृत्यू झाल्याने रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले असल्याचे चित्र समोर आले आहे.(Latest Pune News)
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील 107 रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील सन 2025 च्या (जानेवारी ते सप्टेंबर 2025) अवघ्या नऊ महिन्यांतील मृत्यूंची ही स्थिती आहे. असे रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाकडून ही नोंद नोंदवली गेली आहे. अशा घटनांचे प्रमाण अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रशासन पातळीवर विविध ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातील उपाययोजना केल्या जात असल्याचेही बेहरा यांनी यावेळी सांगितले.
तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात
रेल्वेच्या पुणे विभागात 107 स्थानके आहेत. त्याअंतर्गत पुणे विभागाकडून विविध स्थरावर कामे चालतात. यानुसार रेल्वे प्रशासनासह आरपीएफकडे प्रवाशांची, रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या मालमत्तांच्या सुरक्षांची मोठी जबाबदारी असते. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानासह प्रवाशांची सुरक्षितता, ही मोठी जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल पार पाडत असते.
‘आरपीएफ’ने वाचवले अनेक प्रवाशांचे प्राण
एकीकडे दुर्घटनांमध्ये प्रवाशांच्या मृत्यूंची भव्य आकडेवारी असली तरी जीवाची पर्वा न करता आरपीएफ जवानांनी प्लॅटफॉर्मवरून गाडीमध्ये चढताना रेल्वेखाली जाणाऱ्या अनेक प्रवाशांना वाचवल्याच्या अनेक घटना देखील पुणे विभागात सन 2025 मध्ये आल्या आहेत. या घटनांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या या कामगिरीचे रेल्वेच्या वर्तुळात कौतुक केले.
अशा घटना रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 301 जणांचे रेल्वे दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याची नोंद पुणे विभागात करण्यात आली आहे. हे थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.
हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग