धायरी : रस्ता परिसरातील अभिरुची मॉलजवळ हवेली पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने ठेवली आहेत. ही वाहने पदपथ व सिंहगड रस्त्यावर उभी करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. अभिरुची मॉलच्या आवारात असलेली वाहने काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उचलली आहेत. परंतु रस्त्यावरील वाहने अद्यापही 'जैसे थे' आहेत. ही वाहने उचलण्यास पोलिसांना अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेली दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने अभिरुची मॉलच्या प्रवेशद्वारापासून महालक्ष्मी मंदिराच्या रस्त्यावर कायमस्वरूपी उभी करण्यात आली आहेत. यामुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे वाहनचालक व पादचार्यांची मोठी गैरसोय होत आहे. या वाहनांमध्ये झाडे-झुडपे वाढली असून, कचराही साचला आहे. तसेच परिसरात दलदल तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. तसेच अभिरुची मॉलही आहे. यामुळे या रस्त्यावर सतत नागरिकांची वर्दळ असते. मात्र, पदपथ व रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ही वाहने तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्याची मागणी नागरिकांकडून
होत आहे.
अडीचशेपेक्षा जास्त वाहने
सिंहगड रस्ता व पदपथावर दोनशे दुचाकी, दोन डंपर, दहा कार, एक टेम्पो, एक रिक्षा, अशी एकूण अडीचशे पेक्षा जास्त वाहने गेल्या अनेक दिवसांपासून उभी करून ठेवण्यात आली आहेत. यामुळे परिसरात वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आंदोलनाचा इशारा
ही वाहने तातडीने हटविण्याची मागणी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांकडे करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन लवकरच त्यांना देण्यात येणार आहे. तरही कार्यवाही न झाल्यास हवेली पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस बाप्पूसाहेब पोकळे यांनी दिला आहे.
विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाशिवाय हलवू शकत नाही. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.