पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे, हे आपण सर्वच बघत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, असे वक्तव्य आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत काय वाटते, या प्रश्नावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सावंत चांगलेच भडकले. पुण्यामध्ये एका राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात सावंत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत प्रश्न विचारल्यावर सावंत पत्रकारांवर भडकले.
मराठा आरक्षणासंदर्भात डॉ. सावंत यांनी 'मराठा समाजाला 2024 पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मी राजीनामा देईन,' असे वक्तव्य पूर्वी केल्याची आठवण करून देत प्रश्न विचारता ते टाळून निघून जात होते. तेव्हा पत्रकारांनी पुन्हा 'तुम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून पळ काढताय का,' असा प्रतिप्रश्न केला. त्या वेळी निघून जात असलेले डॉ. सावंत पुन्हा पत्रकारांजवळ आले, 'महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यांवरून काय चालले आहे, ते तुम्ही आम्ही पाहत आहोत.
त्यामुळे पत्रकारांनी त्या आगीत तेल ओतण्याचे काम करू नये', असे म्हणत आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देत त्यांनी संताप व्यक्त केला. औषधांच्या तुटवड्याच्या संदर्भात सावंत म्हणाले, 'संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमधून मोफत उपचार सुरू झाले आहेत. त्या ठिकाणी बाह्यरुग्ण (ओपीडी)आणि आंतररुग्ण विभागाच्या (आयपीडी) रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, औषधांची मागणी अधिक वाढली आहे. तो औषधांचा महिन्याचा साठा आठ दिवसांत संपायला लागला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा पातळीवर औषधे खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर औषध खरेदी करण्यात येत आहे.
2012 पासून आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार नव्हती. ते करून घेण्याचे काम केले. दोन-चार दिवसांत आरोग्य संचालकपदाची जाहिरात येईल. संचालनालयात काही जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे. तसेच, पुढील काही दिवसांत संचालक हे पद भरलेले तुम्हाला पाहायला मिळेल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा