Pune News :बेवारस वाहनांवरील कारवाई गुंडाळली

Pune News :बेवारस वाहनांवरील कारवाई गुंडाळली

पुणे : शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला अनेक महिन्यांपासून धूळ खात उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवरील कारवाई महापालिकेने गुंडाळल्याचे चित्र आहे. परिणामी, या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्‍यांना अडथळा होत आहे. शहरात 15 वर्षांहून अधिक जुनी झालेली तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहनमालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी हजारो वाहने शहरातील लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत.

या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागतो. दुसरीकडे या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हलविण्यासाठी आरटीओच्या मदतीने वाहनमालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतरही वाहने न हलविल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते.

मात्र, मागील काही महिन्यांपासून ही कारवाई बंद आहे. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्‍यांना अडथळा होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेने मिरवणूक मार्गावरील बेवारस व धूळ खात उभ्या असणार्‍या वाहनांवर चोवीस तासात ती हलवण्याची नोटीस चिटकवल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही ही वाहने जागेवरच आहेत. ही वाहने केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातच आहेत असे नाही, तर उपनगरांमध्येही अशी वाहने रस्त्याच्याकडेला आणि फूटपाथवर धूळ खात उभी आहेत.

याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना वाहतूक पोलिसांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाणी, पोलिस चौक्या आणि वाहतूक पोलिसांची कार्यालये आदींच्या परिसरात सर्वाधिक वाहने अनेक महिन्यांपासून पडून असल्याचे पहायला मिळते. या वाहनांच्या माध्यमातून एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news