निनाद देशमुख
पुणे: पुणे महापालिकेची प्रभागरचना नुकतीच जाहीर झाली आहे. 4 सदस्यीय प्रभागरचनेवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून, तिला चुकीचे म्हटले आहे. दरम्यान, पुण्याच्या विकासासाठी बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एका नगरसेवकाचा वॉर्ड असावा, असा कल 47 टक्के मतदारांनी केला आहे.
एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली असून, यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळत असल्याचे देखील मतदारांनी म्हटले आहे. तर केवळ 27 टक्के मतदारांनी बहुसदस्यीय प्रभागाला पसंती दिली आहे. (Latest Pune News)
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांचा पहिला टप्पा म्हणजे प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात चार सदस्यीय वॉर्डचे 41 प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत.
यातील एक प्रभाग हा 5 सदस्यीय राहणार आहे, तर नगरसेवकांची संख्या ही 165 राहणार आहे. ’पुण्याच्या विकासासाठी किती नगरसेवकांचा प्रभाग असावा,’ यासाठी युनिक फाउंडेशनद्वारे ’शहरी स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग पद्धतीचा अभ्यास 2025’ या मथळ्याखाली नागरिकांचा कल जाणून घेण्यात आला. यात ही माहिती समोर आली आहे. यात विविध निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
सर्वेक्षणानुसार एखाद्याच व्यक्तीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले आहे. बहुतांश जणांचा कल हा एक सदस्यीय वॉर्ड किंवा दोन सदस्यीय वॉर्ड याकडे आहे. चार ईव्हीएमऐवजी एका मशिनवर मतदारांना मतदान करणे सोईचे जाते, असे 89 टक्के मतदार म्हणतात.
सामाजिक कामांसाठी आणि विकासकामांसाठी एक किंवा दोन सदस्यीय वॉर्ड रचना महत्त्वाची आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत वॉर्ड सभा नियमित होत नाही. तसेच प्रभागरचना ही कायमच सत्ताधारी पक्षाचे हित जपणारी आहे.
राजकीय हित जपण्यासाठी व पक्षीय राजकारण मोठे करण्यासाठी प्रभागरचना महत्त्वाची आहे. प्रभागरचनेत व्यक्तीपेक्षा राजकीय पक्ष वरचढ ठरतो. एका विधानसभा मतदारसंघातून एक लोकप्रतिनिधी निवडला जात असताना एका वॉर्डमध्ये 4 सदस्य निवडणे संयुक्तिक ठरते का, असा सवालदेखील काही मतदारांनी उपस्थित केला आहे.
आर्थिक निधी आणि प्रभागरचना यांचा तेवढा संबंध नसला तरी विकासकामे करताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना पूर्णपणे झुकते माप दिले जाते असे देखील काहींनी म्हटले आहे. तर अरक्षणापासून तोडगा काढण्यासाठी प्रभागरचना आली आहे, असे काहींनी या सर्वेक्षणात म्हटले आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मते, राज्यात मुंबई वगळता दोन सदस्यीय वॉर्ड रचना अस्तित्वात आणावी. पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकेतदेखील दोन सदस्यीय वॉर्ड रचना करण्यास काही हरकत नसावी, प्रभागापेक्षा वॉर्ड लहान असतील तर कामे त्वरित होतात.
दुसरे म्हणजे पक्षापेक्षा दोन वॉर्डरचनेत व्यक्तीचे महत्त्व कायम असते. दोन सदस्यांमध्ये कोणत्या सदस्याने कामे केली त्यानुसार जनता त्या व्यक्तीला प्राधान्य देते. प्रभागरचनेची भौगोलिक सलगता हा एक प्रमुख निकष आहे. हा निकष राजकीय हस्तक्षेपाशिवाय पाळला गेला पाहिजे, असेदेखील काहींनी म्हटले आहे.
2017 मध्ये भाजपच्या वाढल्या 528 जागा
2012 सालच्या मनपाशी तुलना करता 2017 साली भाजपच्या तब्बल 528 जागा वाढल्या आहेत. तर काँग्रेसच्या 126 जागा, राष्ट्रवादीच्या 185 जागा, मनसेच्या 99 जागा कमी झाल्या आहेत. मनपाच्या म्हणजे शहरी राजकारणात भाजप एक नंबरवर, शिवसेना दुसर्या, तर काँग्रेस तिसर्या स्थानी आहे.
राष्ट्रवादी चौथ्या स्थानी असून पाचव्या स्थानी असलेल्या मनसेची जागा एमआयएम व बसपाने घेतलेली दिसते. 2012 सालात केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याचा व बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा दोन्ही काँग्रेसला फायदा झाला होता. 2012 साली पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत चार सदस्यीय काही वॉर्डात कामे नसणार्या, लोकांना फारशी ओळख नसणार्या व्यक्ती पॅनेल पद्धतीत राष्ट्रवादीकडून निवडून आल्या. हाच प्रकार 2017 सालच्या पुणे मनपा निवडणुकीत भाजपबाबत समोर आलेला दिसतो.