

Navle Bridge Accident :
धायरी/पुणे: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. गुरुवारी (२२ एप्रिल) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्याने चार वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे किंवा चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. या कंटेनरने महामार्गावरून जाणाऱ्या दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांना धडक दिली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. धडक इतकी भीषण होती की वाहनांचा चक्काचूर झाला, मात्र चालकांनी प्रसंगावधान राखल्याने आणि एअरबॅग्जमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
नवले पूल आणि नऱ्हे सेल्फी पॉइंट परिसर संपूर्ण देशात 'ब्लॅक स्पॉट' म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. तीव्र उतार आणि चालकांचा वेगावरील ताबा सुटणे ही यामागची प्रमुख कारणे सांगितली जातात. गेल्या काही वर्षांत येथे शेकडो छोटे-मोठे अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रशासनाने येथे रंबल स्ट्रिप्स, गतीरोधक आणि वेगमर्यादेचे फलक लावूनही अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये.
गुरुवारी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, या मृत्यूच्या सापळ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.