

बाळासाहेब पांडे
नायगाव : प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा पुन्हा एकदा फटका नागरिकांना बसला असून, कौठा–गडगा मार्गावरील मानार प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील धोकादायक पुलावर रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. अरुंद व असुरक्षित पुलामुळे एका कारने थेट कालव्यात कोसळत पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 26 सीपी 0209 क्रमांकाची कार गडगा येथून कौठ्याकडे येत असताना पुलाजवळ चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट कालव्यात कोसळली. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान बालक गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण राऊतखेडा येथील सेवानिवृत्त सैनिक व त्यांचे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 26 सीपी 0209 क्रमांकाची कार गडगा येथून कौठ्याकडे येत असताना पुलाजवळ चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट कालव्यात कोसळली. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान बालक गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण राऊतखेडा येथील सेवानिवृत्त सैनिक व त्यांचे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून कालव्यात उतरून जखमींना बाहेर काढले. तातडीने त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कालव्यात पाणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा हा अपघात जीवघेणा ठरला असता. मात्र, याच पुलावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ता रुंद असताना पुल मात्र अत्यंत अरुंद असून कोणतेही मजबूत रेलिंग, इशारा फलक किंवा पुरेशी प्रकाशयोजना नाही. त्यामुळे हा पुल अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित पुलाचे तात्काळ रुंदीकरण करावे, मजबूत संरक्षक रेलिंग बसवावे, इशारा फलक व प्रकाशयोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.