

पुणे: उन्हाचा चटका त्यात मॉन्सून लांबणीवर पडून पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम फळांच्या उत्पादनावर झाला आहे. बाजारात फळांची आवक घटली असून बहुतांश फळांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड, खरबूजाच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
गुजरात येथून येणाऱ्या चिक्कूचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने बाजारात चिक्कूची आवक घटू लागली आहे. मॉन्सून अद्याप सक्रीय नसला तरी पावसास सुरवात झाल्यानंतर लिंबाला भाव मिळणार नाही, या शक्यतेने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे.
या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणी अभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत. कोकणातील हापूसचा हंगाम संपल्याने बाजारात कर्नाटक आंब्याची चालती आहे. पाण्याच्या तुटवड्याने डाळींबाच्या दर्जात घसरण झाली आहे. दर्जेदार डाळींबाची आवक रोडावली आहे. पावसाच्या आगमनानंतर डाळींबाच्या दर्जासह आवकेत वाढ होईल असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. डाळींबासह उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. 14) लिंबू 7०० ते 8०० गोणी, मोसंबी १५ ते २० टन, संत्रा १ टन, डाळींब 30 ते ३5 टन, पपई १५ ते २० टेम्पो, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ७ ते ८ टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, पेरु २०० क्रेट, अननस ५ ट्रक आणि कर्नाटक आंब्याची 9हजार लाकडी पेटी आणि प्लॅस्टिक क्रेट 4 हजार इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 3०० ते ११००, मोसंबी : (३ डझन) : ४२०-६६० (४ डझन) : २२०-४५०, संत्रा : (१० किलो) : ४००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२८०, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-30, कलिंगड : २०-२५, खरबूज : ३०-३५, पपई : १०-१५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरु (२० किलो) : २००-४००, अननस (१ डझन) : १००-६००, आंबा : कर्नाटक हापूस ३ ते ५ डझन (कच्चा) : १२०० ते १६००, (१ किलो) : 6० ते ९०, पायरी (४ डझन) १००० ते १४००, लालबाग (एक किलो) २५ ते ३०, बदाम (एक किलो) 30 ते ४0, तोतापुरी २५ ते ३५, निलम २५ ते ३५. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ८० ते 18०.