

पुणे: गुजरात येथून येणाऱ्या चिक्कूचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने बाजारात चिक्कूची आवक घटू लागली आहे. रविवारी बाजारात दहा किलोच्या एक ते दीड हजार डागांची आवक झाली. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने चिक्कूच्या भावात दहा किलोमागे दोनशे रुपयांची वाढ झाली. उन्हाचा चटका कायम असल्याने कलिंगड आणि खरबूज फळाला मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तर, पपईच्या मागणीत घट झाली आहे.
मान्सून राज्यात दाखल झाल्याने येत्या काळात लिंबाला भाव मिळणार नाही, या शक्यतेने शेतकऱ्यांकडून लहान व कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने मागणीअभावी त्याचे घटलेले दर टिकून आहेत. कोकणातील हापूसचा हंगाम संपल्याने बाजारात कर्नाटक आंब्याची चालती आहे.
आवक वाढल्याने कर्नाटक आंब्याचे भाव दहा टक्क्यांनी कमी झाले. पाण्याच्या तुटवड्याने डाळिंबाच्या दर्जात घसरण झाली. दर्जेदार डाळिंबाची आवक रोडावली आहे. पावसाच्या आगमनानंतर डाळिंबाच्या दर्जासह आवकेत वाढ होईल, असे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले. डाळींबासह उर्वरित सर्व फळांची आवक आणि जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. ७) लिंबू १००० ते १२०० गोणी, मोसंबी १५ ते २० टन, संत्रा १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १५ ते २० टेम्पो, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ७ ते ८ टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, पेरू २०० क्रेट, अननस ५ ट्रक आणि कर्नाटक आंब्याची १० ते १५ हजार लाकडी पेटी आणि प्लास्टिक क्रेट १० हजार इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २०० ते ९००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-५८० (४ डझन) : १५०-४००, संत्रा : (१० किलो) : ६००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-२५, कलिंगड : २०-२५, खरबूज : ३०-३५, पपई : १०-१५, चिक्कू (दहा किलो) : ३००-६००, पेरु (२० किलो) : ६००-८००, अननस (१ डझन) : १००-६००, आंबा : कर्नाटक हापूस ३ ते ५ डझन (कच्चा) : ५०० ते १३००, (१ किलो) : ५० ते ९०, पायरी (४ डझन) ६०० ते १०००, लालबाग (एक किलो) २० ते ३०, बदाम (एक किलो) २५ ते ३५. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ८० ते २००.