

पुणे: उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांची पावले फ्रुटस्टॉल, सरबत विक्रेते तसेच रसवंतिगृहांकडे वळू लागली आहेत. परिणामी, बाजारात कलिंगड, खरबूज, डाळिंब या रसाळ फळांसह लिंबांना मागणी वाढली आहे. त्यातुलनेत कमी प्रमाणात माल बाजारात येत असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपये, तर डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घशाची कोरड सुकविण्यासाठी पुणेकर सरबत, उसाच्या रसाचा आधार घेत आहेत. त्याअनुषंगाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांना मागणी होऊ लागली आहे.
त्यातुलनेत आवक कमी होत असल्याने लिंबाच्या 15 किलोच्या गोणीमागे दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. मृगबहरातील संत्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने अहिल्यानगर येथून होणारी आवक घटली आहे. आवक-जावक कायम असल्याने संत्रीसह उर्वरित सर्व फळांचे दर टिकून गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याचे सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. 19) मोसंबीची 30 ते 35 टन, संत्रा 1 ते 2 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबाची सुमारे 600 ते 1000 गोणी, कलिंगड 15 ते 20 गाड्या, खरबूज 10 ते 15 टेम्पो, चिकू 2 हजार गोणी, पेरू 100 ते 125 क्रेट, अननस 6 ट्रक, कोकण हापूस आंबा सात ते आठ हजार पेटी आणि कर्नाटक आंब्याची अकरा हजार पेट्या आणि बॉक्स इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 500-2300, मोसंबी : (3 डझन) : 170-320, (4 डझन) : 60-140, संत्रा : (10 किलो) : 400-1500, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-280, आरक्ता : 10-60, गणेश : 10-35, कलिंगड : 10-15, खरबूज : 15-20, पपई : 8-25, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरू (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन) : 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 700-1200, हापूस (4 ते 7 डझन) कच्चा 2000-4500, कर्नाटक : हापूस (3 ते 5 डझन) 1000-1600, पायरी (4 डझन) 700-1000.