

पुणे: वडकीतील एका व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई टोळीने खंडणीसाठी धमकाविल्याचा प्रकार समोर आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यावसायिक हे मेडिकल डिस्ट्रीब्यूटर असल्याची माहिती असून, बुधवारी (दि. २४) त्यांना धमकीचा फोन आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाकडून यासंदर्भात माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडकी परिसरात या व्यवसायाचे होलसेल औषध विक्रीचे दुकान आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने या व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून इंटरनेट कॉलिंग करून खंडणीसाठी धमकावले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, सदर प्रकरणाची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सोमवारी ( दि. २२) रात्री फुरसुंगी परिसरातील एका लोखंड व्यावसायिकाकडे तब्बल ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत संबंधित व्यावसायिकाच्या गोडाऊनवर बिष्णोई टोळीने गोळीबार केला होता.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित पंटर आरजू बिष्णोई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. लोखंड व्यावसायिकावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता वडकी परिसरातील मेडिकल डिस्ट्रीब्यूटरला धमकी मिळाल्याची बाब समोर आल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून संबंधित धमकीची सत्यता, त्यामागील व्यक्ती आणि वापरण्यात आलेल्या माध्यमांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
बिष्णोई गँगच्या पंटरने कर्मचारी बनून केली रेकी; ५० कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार
फुरसुंगी येथे एका लोखंड व्यावसायिकाच्या गोडाऊनच्या गेटवर ५० कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी केलेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील ओळख पटलेला आरोपी हा लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असून, तो यापूर्वी या परिसरातील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता. त्यानेच या व्यावसायिकाच्या गोडाऊनची रेकी करून त्याची माहिती बिष्णोई टोळीला पुरविल्याचा संशय आहे. पोलिसांना या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांना मिळून आली आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलेले नाही.
गुन्हेशाखा आणि स्थानिक पोलिस असे मिळून शंभरपेक्षा अधिक पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौज फाटा आरोपींच्या मागावर आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार फुरसुंगी पोलिसांनी आरजू बिष्णोई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे व्यावसायिक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात असताना, त्यांच्या गोडाऊन वरती गोळीबार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फुरसुंगी औद्योगिक परिसरातील एका व्यावसायिकाच्या गोडाऊनच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गोळीबार केला होता. या घटनेपूर्वी व्यवसायाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तपासादरम्यान गोळीबारात सहभागी असलेल्या एका आरोपीने पूर्वी या परिसरातील एका कंपनीत कामगार म्हणून काम केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे एका आरोपीची ओळख पटवली आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात यश आलेले नाही.