

पुणे: महापालिकेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पावरून कोंढवा परिसराला निधी न दिल्याच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. कोंढव्याचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याचा आरोप करताच भाजपकडून तीव आक्षेप घेण्यात आला. यानंतर घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.
महापालिकेच्या 2026-2027 च्या अर्थसंकल्पावर बुधवारी सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. या वेळी विरोधकांनी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला, तर सत्ताधारी नगरसेवकांनी हा आत्तापर्यंतचा सर्वांत चांगला अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. भाजपतर्फे ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणा दिल्या जातात. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोंढव्याला जाणीवपूर्वक निधी देण्यात आला नाही. विरोधक असल्याने आम्हाला निधीपासून वंचित ठेवण्यात आले, हे एक मोठे षड्यंत्र आहे, असा आरोप करीत निधी देताना दुजाभाव केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे कोंढव्याचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी केला.
पठाण म्हणाले, पुण्यात ‘सबका साथ, सबका विकास’ प्रत्यक्षात दिसत नाही. आम्हाला मूलभूत सुविधांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. शिक्षणाबाबतीतही अन्याय होत असून, महापालिकेच्या दोन शाळा असतानाही सुमारे 15 हजार विद्यार्थी खासगी शाळांत शिक्षण घेत आहेत. या शाळांना 72-ब अंतर्गत निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली; मात्र ती टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पठाण यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपचे धीरज घाटे यांनी केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्यात मुस्लिम सर्वाधिक पुढे असल्याचे सांगितले. तसेच शहराच्या इतर भागांतही मुस्लिम नागरिक राहतात आणि त्या भागांत निधी देण्यात आला आहे, असे नमूद करीत अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने सभागृहातील वातावरण तापले. पठाण यांनी केवळ अर्थसंकल्पावर बोलावे, असे घाटे म्हणाले. घाटे यांच्यासह राजेंद्र शिळीमकर, पुनीत जोशी, अजय खेडेकर आणि व्यंकोजी खोपडे यांनीही विरोध दर्शविला. या वेळी घाटे यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.
पठाण यांचे वक्तव्य कामकाजातून वगळले
पठाण यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला. जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले. दरम्यान, काँग््रेासचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी पठाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर महापौर मंजूषा नागपुरे यांनी हस्तक्षेप करीत पठाण यांना शाळांवरील विषय बाजूला ठेवून केवळ अर्थसंकल्पावर बोलण्याचे निर्देश दिले आणि त्यांचे काही वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले.