

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या तिरंगा रॅलीमुळे मंगळवारी मध्य पुण्यातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. रॅली सुरू होण्यापूर्वीच अनेक रस्ते बंद केल्याने डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कामकाजाच्या दिवशी झालेल्या या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य वाहनचालकांना बसला. पोलिसांचे वाहतूक नियोजन कोलमडल्याने पुणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भाजपच्या वतीने मंगळवारी रॅलीचे आयोजन केले होते. रॅली ललित महल हॉटेल चौकातून सुरू होणार होती. मात्र, रॅलीच्या नियोजित वेळेपूर्वीच वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली. त्यामुळे अचानक पर्यायी मार्गावर वाहनांचा ताण वाढला आणि काही वेळातच मध्य पुण्यातील प्रमुख रस्ते वाहनांच्या गर्दीत अडकले. फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात संथ झाली. गुडलक चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक आणि गरवारे चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
स्वारगेटकडून डेक्कनकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरही वाहनांची मोठी कोंडी झाली होती. सारसबाग, दांडेकर पूल आणि नळस्टॉप चौक परिसरात वाहतूक मंदावल्याने वाहनचालकांना मोठा वेळ खोळंबून राहावे लागले. वाहतूक पोलिसांनी कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहतूक वळविली होती. मात्र, विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने हे मार्गही काही वेळातच कोंडीत अडकले. एका मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविल्याने समस्या सुटण्याऐवजी कोंडी आणखी वाढल्याचे चित्र होते.
रॅलीचे आयोजन कामकाजाच्या दिवशी करण्यावरूनही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रॅलीसाठी रस्ते बंद करण्यापूर्वी नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा विचार का केला नाही? असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला. रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस, कार्यालयीन कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
सामान्य नागरिकांना तासनतास रस्त्यावर अडकवणे योग्य आहे का?' असा संतप्त सवाल पुणेकरांनी केला. रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पूर्वनियोजन केले असले तरी प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाल्याने मध्य पुण्याला कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे रॅलीपेक्षा वाहतूक कोंडीचीच चर्चा रंगली होती.