

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारलेल्या 'ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम'वर (एटीएमएस) भांडवली खर्च आणि देखभाल-दुरुस्ती मिळून आतापर्यंत तब्बल ११५ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सेवा करारातील त्रुटी आणि यंत्रणेच्या 'अपटाइम-डाउनटाइम'च्या आधारे संबंधित ठेकेदाराकडून ७४ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली नाही. महापालिकेने मात्र प्रवासाचा वेग वाढल्याचा दावा केला आहे.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी विचारण्यात येत असलेल्या प्रश्नोत्तरासाठी विरोधी पक्ष नेते ॲड. नीलेश निकम यांनी विचारलेल्या प्रश्नातून ही माहिती उघड झाली आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एटीएमएससाठी १० जानेवारी २०१९ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. कामाची मुदत ६९ महिन्यांची होती. कामाच्या चार 'रनिंग बिलां'पोटी ९८ कोटी ६२ लाख रुपये, तर २२ एप्रिल २०२४ रोजी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच तिमाहींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १७ कोटी १० लाख रुपये अदा करण्यात आले. १२५ चौकांसाठी १०२ कोटी रुपये खर्च झाल्याने एका सिग्नलवर ८१ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा प्रशासनाने फेटाळला आहे.
मूळ भांडवली निविदेची रक्कम १०२ कोटी ६२ लाख रुपये होती आणि त्यात सहा विविध घटकांचा समावेश होता. प्रत्यक्ष एटीएमएस सिग्नलसाठी ५८ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद होती. त्यानुसार प्रत्येक चौकातील सिग्नलचा सरासरी खर्च ४७ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, एटीएमएसमुळे २०१८ च्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत १०.०४ टक्के सुधारणा, वाहनांच्या सरासरी वेगात १३.०५ टक्के वाढ, तर 'ग्रीन सिग्नल'च्या प्रमाणात ७० टक्के वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्रत्यक्ष वाहतूक कोंडी कायम असल्याने कोट्यवधींच्या या यंत्रणेचे स्वतंत्र परिणाममूल्यांकन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलिस प्रमाणपत्रानंतरच बिल
पुणे पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्मार्ट सिटीला पत्र पाठवून ठेकेदाराचे बिल अदा करण्यापूर्वी कामाची पडताळणी आणि 'यूजर सर्टिफिकेट' घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर पोलिसांचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतेही बिल अदा केले जाणार नाही, असे स्मार्ट सिटीने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कळविले. आतापर्यंतची बिले पोलिसांच्या प्रमाणपत्राच्या आधारेच दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कायम
पुण्यात वाहतूक कोंडी कमी व्हावी व वाहतुकीचा वेग वाढवा, यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. यावर कोट्यवधी खर्चूनही पुण्यात वाहतूक कोंडी कायम आहे. स्मार्ट सिग्नल असूनही मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने एकाच सिग्नलवर पुणेकरांना वेळ वाया घालवावा लागत आहे. त्यामुळे पुण्याची वाहतूक स्मार्ट झाल्याच्या महापालिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एटीएमएसचा लेखाजोखा एकूण चौक : १२५
एटीएमएस सिग्नलवरील भांडवली तरतूद: ५८.७५ कोटी
प्रतिसिग्नल सरासरी खर्च : ४७ लाख
एकूण भांडवली बिले : ९८.६२ कोटी
देखभाल-दुरुस्तीची बिले : १७.१० कोटी
एकूण अदा रक्कम : ११५.७२ कोटी
ठेकेदाराकडून वसूल दंड : ७४ लाख रुपये