

पुणे: शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहरासाठी अतिरिक्त २५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी महापौर मंजूषा नागपुरे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
महापौर नागपुरे यांनी शहराच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री विखे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.
तसेच, मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्यस्तरीय मिशन स्थापन करणे, नदीतील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण आणि पूरव्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबविण्याची मागणीही त्यांनी केली.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील गाळ काढून जलसाठाक्षमता वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे तसेच धायरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने देण्याची मागणीही महापौरांनी या वेळी केली. दरम्यान, महापौरांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.