![वीर धरणाची मान्सूनपूर्व कामे पूर्ण, पूर नियंत्रण कक्षाचीही स्थापना](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2Fveer-dam-loksatta-cropped-1607674780.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
परिंचे : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर तालुक्यातील वीर धरण प्रशासनाकडून मान्सून पूर्व तयारी अंतर्गत दुरुस्ती, देखभाल, बिनतारी संदेश, सुरक्षा, पूर नियंत्रण कक्ष आदी कामे पूर्ण करण्यात आली. धरण प्रशासनाने ही माहिती दिली. चालू वर्षी धरणात समाधानकारक पाणीसाठा असून, उन्हाळी आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
या वेळी संभाजी शेडगे, विजय वाल्मिक, रोहिदास धुमाळ, बाळू सोनवणे, सचिन धुमाळ, लखन भांडवलकर आदी कर्मचारी उपस्थित होते. पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची जीवनदायिनी समजल्या जाणार्या नीरा नदी खोर्यातील धरण साखळी क्षेत्रात यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. वीर धरणात 2 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, धरणाच्या उजव्या कालव्यातून 1550 क्युसेक व डाव्या कालव्यातून 827 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत धरणाचे अस्तरीकरण, माती भराव दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. धरणाच्या 9 वर्क दरवाजांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण केली आहेत. धरणाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. बिनतारी संदेश यंत्रणा, पर्जन्यमापक यंत्रणा सज्ज केली असून, पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
– औदुंबर महाडिक, शाखा अभियंता
धरण साठ्याची सद्यस्थिती
वीर : 53 टक्के (5.4 टीएमसी)
गुंजवणी : 27 टक्के (1 टीएमसी)
भाडघर : 22 टक्के (5 टीएमसी)
नीरा देवघर : 24 टक्के (2.5 टीएमसी)