

Maharashtra soil loss survey
पुणे : सरकार दरबारी नुकसानीचे पिकांचे पंचनामे होतात. यंदा पावसाळ्यात खरीपातील पीक तर गेलेच पण जमीनही वाहून गेली आहे. मातीच वाहून गेली त्यामुळे पीक कसे घेणार हा प्रश्न आहे. या खरडून गेलेल्या जमिनीची पंचनाम्यासाठी परिभाषा कशी करणार? असा सवाल अभिनेते प्रविण तरडे यांनी उपस्थित केला.
पुणे पत्रकार संघाच्यावतीने मराठवाडा व विदर्भात पावसामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, चित्रपट निर्माते कैलास वाणी, सरचिटणीस मंगेश फल्ले, शिवार फाउंडेशनचे विनायक हेगाणा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मदतीच्या रकमेचे धनादेश देण्यात आले.
तरडे म्हणाले की, मी एक चित्रपट बनवताना घरी आलो होतो. त्यावेळी टीव्ही पाहताना मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे नुकसानीची माहिती पाहिली. त्यानंतर खूप वाईट वाटले. म्हणून आम्ही चित्रपटाचे शुटिंग बंद करून काहीतरी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मदत गोळा केली. परंतु ती पोहोचवायची कशी म्हणून पुणे पत्रकार संघ व शिवार फाउंडेशन यांच्या माध्यमातून ती करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. त्यासाठी लागेल तेवढी मदत टप्याटप्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे या जमिनीचे पंचनामे कसे होणार आहे, हा प्रश्न आहे. या खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्याचा विद्यार्थ्यांनी अधिकारी झाल्यानंतर नवीन परिभाषा तयार करावी, हे खूप गरजेचे आहे. सरकारने ३० जूनपर्यत कर्जमाफीचा चांगला निर्णय घेतला आहे. ते त्याच्या पद्धतीने योग्य ती भूमिका घेतील. योग्यवेळी ते करतील. तोपर्यत विद्यार्थ्यांनी हार मानू नये.
पुणे हे एकदम छोटे शहर होते. पण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्याला मोठे केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून चांगले अधिकारी होऊन न्याय द्यावा. ज्या ज्या वेळी मातीचा प्रश्न मांडला जातो, तो महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. फक्त अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.