

पुणे: पीएमपीच्या बसगाड्यांचे वाढते ब्रेकडाऊन पाहिल्यावर पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी अवघ्या आठ दिवसांत 35 कर्मचार्यांवर कडक कारवाई केली आहे. तसेच, संबंधित ठेकेदारासोबत बैठक घेऊन तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
मागील महिन्यांत अवघ्या आठ दिवसांत पीएमपीच्या 653 बस ब्रेकडाऊन झाल्याचे वृत्त दै.’पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे पीएमपीचे वाढते ब्रेकडाऊन आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास समोर आला होता. याची दखल पीएमपी अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी घेतली असून, त्यांनी बस ब्रेकडाऊनबाबतची माहिती घेतली. (Latest Pune News)
सर्वाधिक ब्रेकडाऊन हे भाडेतत्त्वावरील बसचे होत असल्याचे या वेळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पीएमपी अध्यक्षा मुधोळ-मुंडे यांनी संबंधित ठेकेदाराची तातडीची मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये ठेकेदाराला तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
माण डेपोच्या ई-बस सर्वाधिक ब्रेकडाऊन...
हिंजवडी भागात पीएमपीने नुकताच ई-बस डेपो सुरू केला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु, या भागात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. या भागात होणार्या कोंडीत ई-बसला तास-तासभर उभे राहावे लागत आहे. या कोंडीतही बस सुरूच (ऑन) असते. त्यामुळे ई-बसची पहिली फेरी पूर्ण झाल्यावर दिवसभरातील इतर फेर्या पूर्ण करण्यासाठी त्या बसमध्ये बॅटरी पॉवरच शिल्लक राहात नाही.
त्यामुळे माण डेपोअंतर्गत धावणार्या ई-बस सर्वाधिक बंद पडत असून, आम्ही या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे पीएमपी अध्यक्षा मुधोळ-मुंडे यांनी दै.’पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
देखभाल दुरुस्ती विभागातील कर्मचार्यांवरही कडक कारवाई
पीएमपीच्या बस ब्रेकडाऊन होत आहेत. त्या बस का ब्रेकडाऊन होत आहेत, कोणत्या चालकाकडून हे मुद्दाम केले जात आहे का? एखादा चालकाकडील बस सातत्याने ब्रेकडाऊन होत आहे का? याची पहाणी करून काही चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, बस रूटवर न जाता सारखी डेपोत बंद पडून परत येते.
त्यामुळे देखभाल दुरुस्ती विभागातील काही कर्मचार्यांवरही कडक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही चालकांकडून दैनंदिन कॅश तिकीट विक्रीपेक्षा जास्त येत आहे, त्यामुळेही काही वाहकांवरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आणखी तपास सुरू असून, या कारवाईचे स्वरूप दंडात्मक आणि निलंबनाचे असणार आहे.
ब्रेकडाऊनसह अन्य काही कारणांसाठी आम्ही आठ दिवसांत 35 कर्मचार्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच सर्वाधिक ई-बस रस्त्यात ब्रेकडाऊन होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधित ओलेक्ट्रा कंपनीच्या ठेकेदारासोबत नुकतीच मीटिंग घेतली आहे. या वेळी हे ब्रेकडाऊन रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. याशिवाय मी स्वत: याकडे लक्ष देऊन काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल