

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात उन्माद करून दहशत निर्माण करणार्या चार जणांच्या टोळक्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, तसेच या चार जणांवर तडीपारीची कारवाई केली. सासवड शहर आणि परिसरातील संपूर्ण गुन्हेगारी संपविण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. वनपुरी (ता. पुरंदर) येथील चंद्रकांत कुंभारकर, चेतन चंद्रकांत कुंभारकर, चंद्रकांत मारुती कुंभारकर आणि वेदांत मच्छिंद्र कटके या चार जणांवर 2015 ते 2023 पर्यंत गावठी दारूची विक्री करणे, दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, दरोडा, गंभीर स्वरूपाची दुखापत, दंगल घडवून आणणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सासवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना अटकदेखील करण्यात आली होती.
पुन्हा गुन्हा करू नये म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, या कारवाईचा कोणताही परिणाम या टोळक्यावर होत नव्हता. उलट ते बेकायदेशीर दारू विकणे, पोलिसांनी पकडल्यावर पोलिसांवरच हल्ला करणे अशा प्रकारचे वर्तन करत होते. या टोळीच्या वास्तव्यामुळे पुरंदर तालुक्यातील लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या टोळीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी पुरंदर तालुक्यातून अन्य ठिकाणी तडीपार केल्याशिवाय प्रतिबंध करणे शक्य नव्हते.
तसा प्रस्ताव मागील वर्षी डिसेंबरमध्ये तडीपार प्राधिकरण यांना पाठवला होता. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून सुनावणीअंती वरील लोकांना पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून, त्यांना पुणे जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे.
दहशत माजवणारे हे गुंड तडीपार प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रवेश करू शकत नाहीत. बेकायदेशीरपणे ते वास्तव्यास आले, तर 112 नंबरवर कॉल करून माहिती द्यावी.
– अण्णासाहेब घोलप,
पोलिस निरीक्षक, सासवड
हेही वाचा