

वाल्हे: एप्रिल महिनाअखेरीस पिंगोरी येथील जय गणेश जलाशयात 5.50 दशलक्ष घनफूट (25 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गराडे पाटबंधारे शाखेचे अधिकारी अविनाश जगताप यांनी ही माहिती दिली. जलाशयात असलेल्या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे यावर्षी या परिसरात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.
सन 1972 मध्ये या तलावाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून पिंगोरीतील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी हा जलाशय वरदान ठरला आहे. या जलाशयामुळे पिंगोरी परिसरातील बागायत शेतीचे क्षेत्र वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी हा जलाशय भरला नव्हता. त्यावेळी ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
मागील वर्षी मे, जून महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जलाशय जून महिन्यातच वाहू लागला. पावसाळ्यातही समाधानकारक पाऊस पडल्याने जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा झाला.
गतवर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याने जानेवारी महिन्यापर्यंत या भागातील ओढे-नाले, बंधारे ओसंडून वाहत होते. परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांचा पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही सुटला होता.
पिंगोरी परिसरात गतवर्षी मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला होता. सद्यःस्थितील एप्रिलअखेरीस जलाशयात सरासरी 25 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे शाखाधिकारी जगताप यांनी सांगितले.