

निरा: पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन दगडी पुलावरून महापुराचे पाणी गेल्यानंतर सुमारे दीड महिन्यापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परतीच्या पालखी सोहळ्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी निरा व पाडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
निरा खोऱ्यात शुक्रवारी (दि. ३१) झालेल्या मुसळधार पावसानंतर वीर धरणातून ६४ हजार ५२३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निरा नदीला पूर आला आणि ब्रिटिशकालीन दगडी पुलावरून पाणी वाहू लागले.
शनिवारी (दि. १) विसर्ग कमी झाल्यानंतर पाणी पुलाखालून वाहू लागले. त्यानंतर पुलावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडल्याचे, तसेच कठड्यांवर झाडांच्या फांद्या व प्लास्टिकचा कचरा अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांची गैरसोय झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पुलावरील कचरा हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र, पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी अवघ्या काही तासांत करण्यात आलेले डांबरीकरण पहिल्याच मोठ्या पुरात उखडल्याने ग्रामस्थांनी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वी या पुलावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याऐवजी डांबरीकरण करण्यात आले. आता पुरामुळे जागोजागी खड्डे पडल्याने भाविक, नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.