

पुणे: नीट-यूटी 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी पुण्यात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन अर्थात एसआयओ आणि इतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. गुडलक चौकात विद्यार्थ्यांनी आगळेवेगळे ‘मुरमुरे बेचो’ आंदोलन केले. ‘नीटची तयारी सोडा, मुरमुरे विका’ असे फलक आणि घोषणा देत ‘एनटीए’ने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा केल्याचा तीव निषेध व्यक्त करण्यात आला.
मॉडर्न कॉलेज आणि डेक्कन परिसरातही आंदोलकांनी ‘चिट्ठे चोर’, ‘एनटीए बरखास्त करा’, ‘डॉक्टरची डिग््राी विक्रीसाठी नाही’ अशा घोषणा देत केंद्र सरकार आणि ‘एनटीए’विरुद्ध रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी पेपरफुटीमुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याचे आणि मानसिक तणाव वाढल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली अनेक एनएसयूआय आणि एसआयओ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्र सरकारने नीट-यूटी 2026 परीक्षा रद्द करून 21 जून 2026 रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे.
परंतु या निर्णयानंतरही विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण, शैक्षणिक नुकसान आणि पुन्हा तयारीचा खर्च याबाबत तीव नाराजी व्यक्त होत आहे. ‘एनएसयूआय’ने ही मोहीम देशव्यापी ‘एनटीए हल्ला बोल’अंतर्गत राबवली असून, दिल्लीतील एनटीए मुख्यालयाबाहेरही मोठे प्रदर्शन झाले.
विद्यार्थी संघटनांनी एनटीएच्या बरखास्ती, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सीबीआयने लातूरच्या कोचिंगशी संबंधित तपास सुरू केला असून, आरसीसी कोचिंगचे संस्थापक शिवराज मोटेगावकर याला अटक केली आहे. या प्रकरणाने कोचिंग उद्योग, परीक्षा पद्धती आणि एनटीएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.