

पुणे: देशात सशस्त्र नक्षलवादी प्रभाव कमी झाला असताना आता विद्यार्थी, तरुणांच्या असंतोषाचा वापर करून त्यांना नक्षलवादी विचारांकडे वळवले जात आहे, असा दावा ज्येष्ठ अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी शनिवारी केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी देखील संविधानिक तत्त्वांचा अवलंब करून पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्पी थिएटर येथे पार पडला. यावेळी राजीव रंजन प्रसाद ‘नक्षलवादी चळवळ काल आणि आज’ या विषयावर बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार श्रीधर लोणी यांना ‘मुख्य ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर पत्रकार अंजली खमीतकर आणि मयुरेश प्रभुणे यांना ‘आश्वासक पत्रकारिता’ पुरस्कार देऊन गौरवले. सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबद्दल मोनेश शेलार यांना ‘विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटीकर, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे उपस्थित होते.
बंदुकीच्या नळीतून नाही, मतपेटीतून सत्ता
भारतीय लोकशाहीची मूलभूत शक्ती मतपेटी आणि संविधान आहे, हे सांगताना त्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींसारख्या प्रभावशाली नेत्यालाही जनतेने सत्तेतून दूर केले असल्याचे स्पष्ट केले. तसेच भारतात सत्ता मिळवण्याचा मार्ग बंदुकीची नळी नसून संविधानिक आणि लोकशाही प्रक्रिया हा आहे, असे प्रसाद यांनी अधोरेखित केले.
आता देशातील तरुण ‘लक्ष्य’
प्रसाद म्हणाले, 'कामगार, शेतकरी आणि आदिवासी समाजातील शोषितांचा नक्षलवादासाठी वापर केला जात आहे. सशस्न नक्षलवादी संघटनांचे प्रमाण कमी होत असताना आता देशातील तरुणांना लक्ष्य केले जात आहे. शिक्षित व्यक्तींकडून नक्षलवादाचा प्रभाव वाढवण्यासाठी नियोजन केले जाते. नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनांमागील विचारधारा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.'