

पुणे: पुण्यातील काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धुमाकूळ घालणारे हे ‘अभाविप’चे कार्यकर्ते नव्हते, तर ते भाजपचे कार्यकर्ते होते. भाडोत्री लोक होते, नशापाणी करून आले होते. त्यांनी तिथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी त्यांना गोंधळ घालून कर्फ्यू लावायचा होता, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले, जे लोक शुक्रवारी घटनास्थळी नव्हते त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत. मध्यरात्रीच्या गोंधळानंतर पोलिसांकडून जी अपेक्षा होती त्यानुसार ते वागले नाहीत. पोलिसांनी राजकीय कारवाई केली. वस्तुनिष्ठ कारवाई केली नाही. मी कोणताही आरोप करत नाही. पण, पत्रकार घटनास्थळी होते. सर्वकाही रेकॉर्ड झाले आहे.
कोणतीही चुकीची घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पण दुसऱ्या गटाचा दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कर्फ्यू लागावा, असा त्यांचा प्रयत्न होता. शनिवारी सकाळी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले. रात्री १० वाजता घडलेल्या घटनेचे सकाळी गुन्हे दाखल झाले. यावरून काय सुरू आहे, हे दिसून येते. शुक्रवारी घडलेल्या घटनेचा आम्ही पाठपुरावा करणार असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले.
आमच्या कार्यकर्त्यांनी तिला बोलायला सांगितलेले नाही
अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीसंदर्भात एका विद्यार्थिनीने व्हिडीओ शेअर करून आपली भूमिका मांडली होती. या व्हिडीओवर काँग्रेस नेते सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित विद्यार्थिनीला या वादात ओढण्याचे समर्थन केले नाही. ‘ती विद्यार्थिनी आहे. तिची स्वतःची भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तिला बोलायला सांगितलेले नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
चोर सोडून संन्याशाला फाशी
आमचे लोक संख्येने जास्त होते आणि भाजपचे कमी होते. आमच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला संयमाची भूमिका घेतली. पण ते आक्रमक होते. शिवीगाळ करत होते. भाजपच्या लोकांनी कायदा हातात घेतला. पण पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम केले, असा आरोप देखील सपकाळ यांनी केला.
‘विद्यार्थ्यांनीच त्यांचा भ्रम फोल ठरवला’
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येऊ नये, यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने हा प्रयत्न फोल ठरल्याचे सपकाळ म्हणाले. “विद्यार्थ्यांनीच त्यांचा भ्रम फोल ठरवला. मुलींनी पुढे येऊन त्यांचा हेतू हाणून पाडला,” असेही त्यांनी सांगितले.