Nawal Kishore Ram: “पुण्याच्या विकासाचा मार्ग नागरी-शैक्षणिक सहभागातूनच”: आयुक्त नवल किशोर राम
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे प्रतिबिंब जर कोणत्या शहरात दिसत असेल, तर ते म्हणजे आपल्या पुण्यात दिसते. विद्यापीठे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसंस्कृत समाज यांच्या माध्यमातून पुणे नेहमीच शिक्षणाचे केंद्र राहिले आहे.
आता आपल्या पुढचे मोठे आव्हान म्हणजे शिस्तबद्ध आणि शाश्वत वाढ साध्य करणे; जेणेकरून भावी पिढ्यांसाठी हे शहर राहण्यायोग्य आणि उत्साही राहील, असे मत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
सिम्बायोसिस सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या वेळी नवल किशोर राम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वैचारिक स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. आज आपल्या समाजातील अनेकांची मने दूषित होत आहेत. माहितीचा गैरवापर, पूर्वग्रह आणि राजकीय अजेंडे यांच्या प्रभावामुळे डॉ. बाबासाहेबांचा संदेश आपल्याला या सर्वांवर मात करून विवेकाने विचार करण्यास आणि मानवी प्रतिष्ठा जपण्यास शिकवतो. महापरिनिर्वाण हा दिवस केवळ स्मरणाचा नाही; तर बाबासाहेबांनी मांडलेल्या मूल्यांचे पालन करण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी पुन्हा अधोरेखित करतो, असे देखील डॉ. मुजुमदार यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार तसेच कुलगुरू डॉ. आर. रमण आदी या वेळी उपस्थित होते.
समाजातील महिलांच्या स्थितीतून कळते राष्ट्राची प्रगती
राम म्हणाले की, एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचे मोजमाप ते त्या समाजातील महिलांच्या स्थितीतून करते. ही मूल्येच आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरली पाहिजेत. नागरी प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सहकार्याची गरज अधोरेखित करीत त्यांनी सांगितले, “नागरिक मंच अधिक सक्षम केले जातील आणि पुणे महापालिका व शैक्षणिक संस्थांमधील भागीदारी आणखी मजबूत केली जाईल. नागरिकांचे आवाज ऐकल्यावरच त्यांच्या अपेक्षा, गरजा आणि दृष्टिकोन अधिक स्पष्टपणे समजतात आणि त्यामुळे आपण अधिक प्रभावीपणे शासन करू शकतो.”

