प्रसाद जगताप/दत्तात्रय नलावडे
पुणे/खडकवासला: ‘नेहमीप्रमाणे आम्ही काम करीत होतो. सायंकाळ होती, त्यामुळे घरी जायचे मनात होते आणि इतक्यात धडधड आवाज आला अन् काही समजायच्या आतच आम्ही मातीच्या ढिगार्याखाली गाडलो गेलो...’ ही आपबिती नांदेड सिटीसमोर मोठ्या खड्ड्यात उतरून सांडपाणी वाहिनीचे काम करताना मातीचा ढिगारा कोसळून गाडला गेलेला चेतलाल प्रजापती हा तरुण सांगत होता.
त्याला त्याच्या इतर कर्मचार्यांनी वरच्यावर असल्याने बाहेर काढले आणि नांदेड सिटी येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधला. (Latest Pune News)
प्रजापती म्हणाला, ‘जमिनीखाली गाडलो गेल्यानंतर डोळ्यांसमोर फक्त अंधार होता आणि श्वास गुदमरत होता. सर्वत्र शांतता पसरली होती आणि भीतीने हृदय बंद पडते की काय, अशी भीती वाटत होती. पण, काही वेळातच मला माझ्या सहकारी कर्मचार्यांनी बाहेर काढले आणि माझ्या जिवात जीव आला.
मात्र माझे सहकारी कनिराम आणि खुर्शीद अली त्यावे ळी जमिनीखालीच होते. मला बाहेर काढल्यानंतर तत्काळ दवाखान्यात पाठविण्यात आले. खूप त्रास होत आहे. खुर्शीद अली यांनाही बाहेर काढल्याचे समजले. मात्र, कनिराम गेल्याचे समजल्यानंतर खूप दुःख वाटत आहे.
अंधार अन् चिखलात काम करताना कसरत
ढिगार्याखाली कर्मचारी गाडले जाण्याची घटना जंगलात नदीशेजारी घडली. त्यामुळे या भागात प्रचंड चिखल होता अन् त्यातच रात्र झाल्यामुळे प्रचंड अंधारही पडला. अशा अंधारात महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथक आणि पीएमआरडीए अग्निशमन दल हेलोजन लावून काम करीत होते. संपूर्ण अंधारात आणि चिखलात काम करताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. असे असले तरी त्यांनी प्रयत्न करून बचाव कार्य उशिरापर्यंत सुरू ठेवले आणि ढिगार्याखाली अडकलेल्या कनिराम यांना बाहेर काढण्यात यश आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
स्थानिकांकडून या घटनेबाबत मला माहिती मिळाली. मी तत्काळ आमच्याकडील एक पथक घटनास्थळी पाठवून दिले. काही वेळातच आमचे पथक चेतलाल प्रजापती यांना घेऊन रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आणल्यावर आम्ही तातडीच्या सर्व आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या. आता त्यांची तब्येत चांगली आहे. तरीसुद्धा मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
- डॉ. रवींद्र कचरे, नांदेड सिटी मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल (चेतलाल प्रजापती यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर)
आम्ही चार-पाच जण या ठिकाणी काम करीत होतो. त्या वेळी अचानक आवाज आला आणि आमचे काही सहकारी या मातीखाली दबले गेले. त्यात आमचे तीन सहकारी गाडल्याची आम्हाला माहिती समजली. आम्ही लगेचच त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि आमचे ठेकेदार नकुलभाई यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दल आणि महापालिकेकडून आम्हाला मदत मिळाली. सर्वांच्या मदतीने दोघांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, कनिराम यांची माहिती समजल्यावर दुःख होत आहे.
- अजय कुमार, प्रत्यक्षदर्शी