Pune Mumbai Bengaluru Highway: मुंबई-बंगळुरू महामार्ग पुणे रिंगरोडशी जोडला जाणार; शहरातील वाहतुकीला दिलासा
पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते बंगळुरू यादरम्यान एक नवा मार्ग उभारला जात असल्याचे सांगत हा महामार्ग मुंबईहून पुणे हद्दीत आल्यानंतर थेट पुण्याच्या नव्या रिंगरोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुणे शहराची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. तसेच, मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या आणि दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या अवजड वाहनांना पुण्यात न जाता बाहेरूनच प्रवास करता येणार आहे. परिणामी, वेळेची मोठी बचत आणि वेगवान प्रवास होणार आहे.
नव्या नियोजनानुसार, मुंबई-पुणे नव्याने बांधण्यात येत असलेला मार्ग पुण्याच्या रिंगरोडपाशी वळण घेऊन थेट बेंगळुरूच्या दिशेने जाईल. यामुळे मुंबईकडून दक्षिणेकडे जाणारी लाखो वाहने पुण्यातील अंतर्गत रस्त्यांवर न येता बाहेरच्या बाहेर जातील. यामुळे मुंबई-बंगळुरू खूपच वेगवान होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पुणे-सातारा मार्ग नूतनीकरणासाठी नवा डीपीआर
पुणे-सातारा मार्गाचे नूतनीकरण करण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गासाठी नवीन डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुण्यातील स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक म्हणजे कात्रज उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, लवकरच ते पूर्ण केले जाईल, असे नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितले.

