Monsoon Withdrawal: यंदा 'या' तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासाला; मान्सून लवकर आला, त्यामुळे लवकर जाणार
Monsoon withdrawal date India 2025
पुणे: यंदा अंदमानापासून ते केरळ आणि पुढे महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास मान्सूनने अतिवेगाने केला. तो राज्यात 13 मे रोजीच धडकला त्यामुळे तो परतीला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याऐवजी 15 सप्टेंबर रोजीच परतीच्या प्रवासाला निघणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनचा देशातून माघारीचा प्रवास सोमवार 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजीहोणार आहे.दरम्यान, राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला असून, शुक्रवारी अनेक भागात हजेरी लावली. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Pune News)
पूर्व राजस्थानातून प्रस्थान ठेवणार..
गेले साडेतीन महिने मान्सून देशभर भरभरून बरसला आहे.सर्व धरणे तुडुंब भरली त्यामुळे समाधानकारक स्थिती आहे.गत दहा वर्षापूर्वी सप्टेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू होत असे मात्र गेल्या काही वर्षात परतीचा प्रवास लांबला होता.ही तारीख 15 सप्टेंबर वरुन 6 ते 15 ऑक्टोबरवर गेली होती.
मागच्या वर्षी तो 6 ऑक्टोबर रोजी परतला होता. मात्र यंदा तो राज्यात पंधरा दिवस लवकर आल्याने बरोबर पंधरा ते वीस दिवस आधीच परतीच्या प्रवासाला निघणार आहे. यंदा येत्या सोमवारपासून पश्चिम राजस्थानपासून त्याची सुरुवात होणार आहे.
पुढे अवकाळी सुरू राहण्याची शक्यता...
सप्टेंबरमध्ये मान्सून परतला तरी पुढे पाऊस पडणार आहे. तो अवकाळी स्वरूपाचा असणार आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.
पण अवकाळी हा सलग नसून, तो अधूनमधून पडण्याची शक्यता जास्त आहे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा कोरडा जाऊन वातावरणातील उष्मा वाढेल आणि ’ऑक्टोबर हीट’ सप्टेंबरच अखेर जाणवू लागेल. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे, असाही अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.
या भागात ऑरेंज अलर्ट ...
बंगालच्या उपसागरात आंध किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, अरबी समुद्र तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागात पाऊस वाढला आहे. सोमवारपर्यंत काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात शनिवारी लातूर, नांदेड ऑरेंज अलर्ट तसेच सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे. अनेक भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी पुणे घाट, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे.

