खडकवासला : पुढारी वृत्तसेवा
आगामी दोन दिवस राज्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. मात्र १ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, १२ सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र धो-धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ ते ४८ तासांपासून राज्यातील पाऊस मोठा कमी झाला आहे.
(Rain Update)
प्रामुख्याने मोठ्या पावसासाठी दिले जाणारे रेड व ऑरेंज अलर्ट गुरुवारी व शुक्रवारी नाहीत. त्यामुळे दोन दिवस राज्यात मध्यम पाऊस राहील. मात्र, सप्टेंबरमध्ये सलग बारा दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज आहे.
पानशेतसह चारही धरण क्षेत्रांत बुधवारी (दि. २८) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. थोडेशी उघडीप आणि ऊन पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक कमी असल्याने खडकवासलाच्या विसर्गात कपात करण्यात आली. सध्या खडकवासलातून मुठा नदीत केवळ चार हजार ७० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत २८.२३ टीएमसी म्हणजे ९६.८३ टक्के साठा झाला होता. मंगळवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजता खडकवासलातून १९ हजार ५६९ क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडले जात होते. पावसाचा जोर ओसरल्याने टप्प्या-टप्प्याने विसर्गात कपात करण्यात आली. खडकवासला धरणमाथा व परिसरात बुधवारी दिवसभर उघडीप होती. त्यामुळे खडकवासलात पावसाची नोंद झाली नाही.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात मात्र रिमझिम सुरू आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा ओसरू लागला. मात्र, अधूनमधून सरी कोसळत असल्याने नद्या, ओढे नाले नाल्यांतून पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे वरसगावमधून चार हजार २४० क्युसेक, पानशेतमधून एक हजार ६२५ व टेमघरमधून एक हजार ५४८ क्युसेकने जादा पाणी खडकवासलात सोडले जात आहे.