पुणे : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्याशाखांच्या एकत्रिकरणाने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पीएचडीसाठी प्रवेश घेण्याकरिता अनेक विद्यार्थ्यांनी विद्याशाखांच्या अनुषंगाने अर्ज केले होते. परंतु मुलाखतीसाठी पात्र झाल्यानंतर त्यांना संबंधित विषयांमध्ये पीएचडी करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पात्रता असूनही विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आल्यामुळे अर्ज करतानाच योग्य ती नियमावली करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी अर्ज करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, मानव्यविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण एका विषयात असताना दुसर्या विषयात पीएचडीसाठी अर्ज भरला. उदा. ज्या विद्यार्थ्याने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे त्या विद्यार्थ्याने 'वाणीज्य आणि व्यवस्थापन' या शाखेतील व्यवस्थापनात पीएचडी करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र सदर विद्यार्थ्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमात व्यवस्थापन हा विषय नसल्याने त्याला पीएचडीसाठी प्रवेश नाकारला गेला. 'वाणीज्य आणि व्यवस्थापन' अशी एकच शाखा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी असे अर्ज केले होते; मात्र त्यांना त्याचा फटका सहन करावा लागला.
अलिकडील काळात विद्यार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया पार पडली. त्यावेळी त्यांना 'ज्या विषयांत तुमचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण झाले आहे त्याच विषयांत तुम्हाला पीएचडी करता येईल,' असे कळविण्यात आले. त्यामुळे आता पुढे काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव राजेंद्र राहेकर यांना विचारले असता त्यांनी, विद्यार्थ्यांनी सर्व माहिती घेऊन अर्ज करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
ज्या विद्यार्थ्यांना अशा अडचणी आल्या आहेत त्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या दुसर्या फेरीत संधी देणार असल्याचे कळविले आहे. विद्यार्थ्यांना पीएचडीच्या पुढील वर्षी अशी अडचण येऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करतानाच आवश्यक बदल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.