

आळंदी : आळंदीच्या वेशीकडे भाविकांची लागलेली नजर अन टाळ-मृदूंगाचा शिगेला पोहोचलेला गजर अशा भक्तीमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साधारण एक महिन्याचा पायी प्रवास करीत, पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन रविवारी (दि. २०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अलंकापुरीत परतली. माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.
पालखीसह शेकडो वारकरी व भाविकांच्या सोबत टाळ-मृदंगाचा गजर करीत संतजनांचा मेळा रविवारी अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखी मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूस स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. महाद्वार चौक, नगरपालिका चौकात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वतीने माऊलीच्या पालखीवर फुलांची उधळण केली जात होती. पालखी वडमुखवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना समजताच भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी पायी चालत जाऊन स्वागत केले.
पालखी नगरपालिका चौक, इंद्रायणी घाट मार्गे हरिहरेंद्र मठ, महाद्वारातून देऊळवाड्यात विसावली. पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच येथेही भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. सोमवारी एकदशीला पालखीची नगरप्रदक्षिणा होणार असून त्यानंतर यंदाच्या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
माऊलींची पालखी अलंकापुरीच्या वेशीवर आल्याचे समजताच देवस्थान कमिटीच्या वतीने संभळ, टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखीस परंपरागत सामोरे जात स्वागत करण्यात आले. यावेळी दहीभाताने माऊलींची दृष्ट काढण्यात आली.