दिवे: हडपसरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्हारगड ऊर्फ सोनोरी किल्ल्यावर सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहे. या वर्षी परिसरात चांगला पाऊस झाल्याने किल्ल्याचा परिसर हिरवाईने नटला आहे. त्यामुळे पर्यटक आवर्जून मल्हारगडाला भेट देत आहेत. किल्ल्यावर विजेची व्यवस्था असून किल्ल्यावर जाण्यासाठी काळेवाडी मार्गे पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे.
दिवे घाटापासून पूर्वेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत सरदार पानसे बंधूंनी सोनोरी ऊर्फ मल्हारगडाची उभारणी केली. किल्ल्यावर शंभू महादेवाचे व खंडोबाचे भव्य मंदिर आहे. विहिरी, भव्य तळे, विशाल तटबंदी, कोरीव कमानी आहेत. (Latest Pune News)
बरीच वर्षे हा किल्ला दुर्लक्षित होता. अलीकडच्या काळात काही समाजसेवी संस्था तसेच दिवे, सोनोरी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने किल्ल्याचा कायापालट केला जात आहे. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. भव्य अशी सागवानी चौकट बसविण्यात आली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी मध्यापर्यंत रस्ता करण्यात आल्याने किल्ल्यावर जाणार्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे .
पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता पावसाने खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. सोनोरीच्या बाजूने सुद्धा रस्त्याचे काम झाले तर या परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
हा परिसर अंजीर, सीताफळाचे आगर म्हणून ओळखला जातो. सध्या बरेच शेतकरी अंजीर, सीताफळ, भाजीपाला किल्ल्याच्या पायथ्याशी विक्री करतात. काही शेतकर्यांनी घरगुती हॉटेल सुरू केली आहेत. शहरी पर्यटक त्याकडे आकर्षित होत आहेत.किल्ल्यावरील अपूर्ण कामे पूर्ण झाल्यास या परिसराचा कायापालट होईल, असे जलसेवक सागर काळे, अमित काळे व सतीश शिंदे यांनी सांगितले.