

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी, आठवी या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. शाळांना निकाल शाळा लॉगिनमधून, तर पालकांना संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये 27 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव इत्यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 27 मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध केला आहे.
ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास त्याचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी, ग््राामीण), अभ्यासक्रमात दुरुस्ती करायची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून ईमेलद्वारे 27 मेपर्यंत पाठवण्याचे आवाहन केले आहे.
दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय शाळेच्या लॉगिनमध्ये 30 दिवसांत कळवण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिक माहिती या संकेतस्थळावर दिली आहे.
दहा लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यंदा पाचवीच्या 6 लाख 57 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 96.61 टक्के, म्हणजेच 6 लाख 34 हजार 920 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते, तर आठवीच्या 3 लाख 87 हजार 623 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 73 हजार 931 विद्यार्थ्यांनी (96.47 टक्के) परीक्षा दिली होती. दोन्ही इयत्ताच्या 10 लाख 8 हजार 851 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.