

आशिष देशमुख
पुणे: जुलैमध्ये राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे १३ जुलैअखेर राज्य सरासरीत काठावर पास झाले असले तरी अजूनही बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षाच आहे. राज्यात ३६ पैकी १६ जिल्ह्यांत कमी, १० जिल्ह्यांत साधारण पाऊस झाला आहे. पाच जिल्ह्यांत मुसळधार तर फक्त ४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला असून, तेथे ७४ टक्के तूट आहे.
सरासरीत राज्य १३ जुलैअखेर काठावर पाऊस झाले आहे. जूनचे ३० आणि जुलैचे १३ दिवस असा ४३ दिवसांच्या मान्सून हंगामाचा विचार केला तर कमी पाऊस पडून देखील राज्य सरासरीत काठावर पास झाले. राज्याची सरासरी ३२१ मि. मी. ची आहे, प्रत्यक्षात ३२२ मि. मी. पाऊस झाला आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकण विभागात सरासरी पेक्षा १५ टक्के तर मध्य महाराष्ट्रात १७ टक्के जास्त झाला आहे. सर्वाधिक तूट ३३ टक्के इतकी मराठवाड्यात असून, विदर्भात २४ टक्के आहे.
नकाशात १ जून ते १३ जुलै या मान्सून हंगामाच्या ४३ दिवसांत राज्याच्या ३६ जिल्ह्यांत पावसाची टक्केवारी दाखवली आहे. गडद निळ्या रंगात अतिवृष्टी, आकाशी रंगात मुसळधार, हिरव्या रंगात साधारण, लाल रंगात कमी, पिवळ्या रंगात खूप कमी पावसाचे जिल्हे दाखवले आहेत.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता
राज्यात २० जुलै पर्यंत पाऊस नाही. मात्र, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील स्थिती पाहता, बाष्पयुक्त ढग राज्याच्या किनारपट्टीकडे वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणात १७ पासून तर उर्वरित भागात २२ जुलै पुढे पाऊस वाढेल, असा ताजा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.